T20 World Cup साठी रोहित शर्माचे 15 महारथी, अशी आहे त्यांची टी20 वर्ल्ड कपमधली कामगिरी

T20 World Cup India Squad : टी20 वर्ल्ड कपासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर 4 खेळाडूंना रिझर्व्ह ठेवण्यात आलं आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल या संघात दिसून येतोय. 1 जूनपासुन सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या रोहितच्या पंधरा महारथींची कामगिरी कशी आहे. 

| Apr 30, 2024, 20:07 PM IST
1/15

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. रोहित भारतासाठी आतापर्यंत 151 टी20 खेळला आहे. यात त्याने 3974 धावा केल्यात. रोहित शर्माच्या नावावर 5 शतक आणि 29 शतकं जमा आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 139.97 इतका आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहितने 39 सामन्यात 963 धावा केल्यात.  

2/15

विराट कोहलची टी20 वर्ल्ड कपमधली कामगिरी दमदार राहिलीय. टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे. पण यानंतरही त्याला टी20 जिंकण्याची संधी एकदाही मिळालेली नाही. कोहली भारतासाठी आतापर्यंत 117 टी20 सामने खेळलाय, आणि यात त्याने 4037 धावा केल्यात. टी20 वर्ल्ड कपमध्ये विराटने 27 सामन्यात 1141 धावा केल्यात.

3/15

22 वर्षांचा यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप खेळणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये यशस्वीने भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यशस्वीने आतापर्यंत खेळलेल्या 17 टी20 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 161.93 इतका आहे.   

4/15

टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा हुकमी खेळाडू असणार आहे तो टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव. सूर्याने भारतासाठी 60 टी20 सामन्यात 2141 धावा केल्या आहेत. आणि त्याचा स्ट्राईक रेट 171.55 इतका जबरदस्त आहे. टी20 क्रिकेटेमध्ये सूर्याच्या नावावर 4 शतक आणि 17 अर्धशतकं जमा आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्या 10 सामने खेळला असून यात त्याने 281 धावा केल्यात.

5/15

भारतीय क्रिकेट संघातील विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतसाठी हा महत्त्वाचा क्षण असणार आहे. कार अपघाता नंतर तब्बल 14 महिन्यांनंतर पंतने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये तो दमदार कामगिरी करतोय. पंत भारतासाठी आतापर्यंत 66 टी20 सामने खेळलाय आणि यात त्याने 987 धावा केल्यात. पंत आतापर्यंत दोन टी20 वर्ल्ड कप खेळला असून यात तो सात सामने खेळलाय. सात सामन्यात त्याने 87 धावा केल्यात.  

6/15

टीम इंडियात सर्वात जास्त चर्चा आहे ती संजू सॅमसनची. आयपीएमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सॅमसनने टीम इंडियात जागा पटकावली आहे. सॅमसन टीम इंडियातील दुसरा विकेटकिपर असणार आहे. सॅमसमने केएल राहुल, ईशान किशन आणि दिनेश कार्तिकला मागे टाकत संघात जागा बनवली आहे. सॅमसनने 25 टी20 सामन्यात 374 धावा केल्या. सॅमसनचा ही पहिलीच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे.

7/15

एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पुन्हा मैदानात उतरला आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. हार्दिकने भारतासाठी खेळलेल्या 92 टी20 सामन्यात 1348 धावा केल्यात. शिवाय त्याने 73 विकेटही घेतल्यात. टी20 वर्ल्ड कपच्या 16 सामन्यात हार्दिकने 243 धावा आणि 13 विकेट घेतल्यात.

8/15

आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या शिवम दुबेला टीम इंडियात जागा मिळाली आहे. शिवम भारतासाठी आतापर्यंत 21 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 276 धावा केल्या असून 8 विकेटही घेतल्यात. शिवम दुबे पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप खेळणार आहे.   

9/15

भारताचा सर्वात अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजाकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. जडेजाने टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 66 सामन्यात 480 धावा केल्या आहेत. तर 53 विकेटही घेतल्या आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये जडेजा 22 सामने खेळला असून यात त्याने 95 धावा आणि 21 विकेट घेतल्यात.

10/15

टीम इंडियाचा दुसरा ऑलराऊंडर अक्षर पटेलने 52 टी20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. यात त्याने 49 विकेट घेतल्यात. तर 144.40 च्या स्ट्राइक रेटने 361 धावाही केल्यात. टी20 वर्ल्ड कपमध्ये अक्षर आतापर्यंत 5 सामने खेळलाय. यात त्याने 3 विकेट घेतल्या आहेत.   

11/15

चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव भारतासाठी आतापर्यंत 35 टी20 सामने खेळला असून यात त्याने 59 धावा केल्यात. कुलदीप यादवचा हा पहिलाच टी20 वर्ल्ड कप आहे. आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर कुलदीपची भारतीय संघात वर्णी लागली आहे.  

12/15

एकदिवसीय वर्ल्ड कपमधून डावलण्यात आलेल्या युजवेंद्र चहलला टी20 वर्ल्ड कपसाठीच्या संघात संधी मिळाली आहे. चहलने 80 टी20 सामन्यात 96 विकेट घेतल्यात. 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चहलला संघात संधी देण्यात आली होती. पण एकाही सामन्यात त्याला खेळवण्यात आलं नाही.

13/15

भारताच्या वेगवान गोलंदाजीची प्रमुख मदार असणार आहे ती यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहवर. बुमराह टीम इंडियाचा हुकमी एक्का असून त्याने आतपर्यंत 62 टी20 सामन्यात 74 विकेट घेतल्या आहेत. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत तो आतापर्यंत 10 सामने खेळला असून 11 विकेट घेतल्या आहेत.   

14/15

गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये संघात असलेल्या अर्शदीप सिंहला यंदाच्या टी20 वर्ल्ड कपसाठीही संधी मिळाली आहे. भारतासाठी 44 टी20 सामन्यात त्याने 66 विकेट घेतल्या आहेत. गेल्या टी20 वर्ल्डमध्ये त्याने 6 सामन्यात तब्बल 10 विकेट घेतल्या होत्या.

15/15

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2024 मध्ये सिराजला फारशी समाधानकार कामगिरी करता आलेली नाही. यानंतरही त्याला संधी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.